एक सुगंध मालवलेलं,
निस्तेज फुल 🥀
झाडावरून गळून पडलं.....
हळुवार मातीवर पहुडलं.
त्याला का त्याचं दुःख झालं....?
की पडल्यामुळे लागलं ?
नाही !
म्लान पाकळ्यांवर त्याच्या,
मंद स्मित झळकलं.
झाडाशी, इतर फुलांशी, अन्
फुलपाखरांशी नातं संपलं,
म्हणून क्षणभर वाईट वाटलं.....
पण फुलताना त्याने सुगंध पसरवला,
फुलपाखरांना मधाचे दान दिले,
पराग कणही वाऱ्यावर सोडले.....
त्याच्या आयुष्याचे 'पूजेचे निर्माल्य' झाले,
अवघ्या देहाचे सोने झाले....!🥀
आता, गळल्यावरही ते कदाचित
देवाच्या चरणीं ऋजू होईल,.....
एखाद्या फुलदाणीत विराजमान होईल,
किंवा कुणा रमणीचा केशसंभार सजवेल.
आणि अखेर मातीशी एकरूप होईल...
तिच्या कुशीत येऊन पडणाऱ्या नव्या बीजासाठी खत होऊन जाईल,.....
नवीन रोप अंकुरेल,
अन् नवीन फूल फुलेल.
फुलण्याचं,आयुष्याचं चक्र असंच चालू राहील.....
आयुष्याचं चक्र अखंड चालूच राहील.....!
🥀🥀🥀

No comments:
Post a Comment