Monday, July 18, 2022

स्वातंत्र्य

नमस्कार,
 मी सुजाता मोघे.
 हे वर्ष आपल्या देशासाठी स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष आहे. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली ! आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी भगतसिंग, सुखदेव इत्यादींपासून, ते अगदी लोकमान्य टिळक, सावरकर, गांधीजी यांसारख्या थोर क्रांतिकारकांनी किती मोठा लढा दिला, हे आपल्या सर्वांना ठाऊक आहेच ! या क्रांतिकारकांच्या बलिदानामुळेच आपण आज स्वातंत्र्याची फळे चाखतो आहोत !
पण आपल्या देशाच्या स्वातंत्र्याविषयी लिहिताना माझ्या मनात विचार आला, की स्वातंत्र्य हे फक्त देशापुरतेच मर्यादित असते का ? आपले सामाजिक आणि व्यक्तिगत आयुष्य, आपले कार्यक्षेत्र यामध्येही स्वातंत्र्याचा तेवढीच गरज असते. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य यांनाही तितकेच महत्त्व दिले पाहिजे !
स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय ?
आई वडील मुलांना स्वातंत्र्य देतात किंवा पती पत्नीला स्वातंत्र्य देतो म्हणजे नेमकं काय ? 
ते कोण स्वातंत्र्य देणारे ....?
त्यांनी स्वतःचे स्वातंत्र्य काढून दिलं का ?
 स्वातंत्र्य असं कधी कुणाला देता येतं का....??
ते तर आपलं स्वतःचं च असतं.....!
प्रत्येकाला ते जन्मतःच मिळालेलं असतं....!
पण प्रत्येकाला स्वतंत्रपणे वागण्याचं धैर्य नसतं.
कारण मग पराभवाचं खापर दुसऱ्यावर फोडता येत नसतं.
स्वातंत्र्य म्हणजे 'स्वैराचार' नव्हे .....
आपल्याला हवं तसं वागणं नव्हे.....!
स्वातंत्र्याबरोबर आलं पाहिजे 'जबाबदारीचे भान',
स्वातंत्र्य म्हणजे 'आत्मसन्मानाची जाण' !
स्वातंत्र्याचे शिवधनुष्य पेलता आलं पाहिजे,
म्हणजे आयुष्य 'आत्म तेजाने' झळाळतं !!
स्वातंत्र्याच्या या संकल्पनेची जाणीव मला शाळेत असल्यापासूनच झाली. शाळेत असतानाच माझ्या आई-वडिलांनी कधीही माझ्यावर, तुला अमुकच नंबर मिळाला पाहिजे किंवा इतके मार्क मिळालेच पाहिजेत किंवा तू या स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घे, अशी जबरदस्ती केली नाही ! त्यांनी फक्त मला अभ्यासाचे महत्त्व पटवून दिले. आयुष्यात जर काही मिळवायचे असेल, चांगली करिअर करायची असेल तर चांगला अभ्यास करणे आणि उत्तम मार्क मिळवणे कसे गरजेचे असते हे त्यांनी मला कायम स्वतःच्या उदाहरणांवरून पटवून दिले.
 पुढे कॉलेजमध्ये असताना सुद्धा, सहलीला जाताना किंवा पार्टी वगैरेंना जाताना, त्यातील संभाव्य धोके माझ्या आई-वडिलांनी मला अगोदरच दाखवून दिले. माझ्या आई-वडिलांनी कायम माझ्यावर विश्वास दाखविला.
 मला असे वाटते की स्वातंत्र्य आणि विश्वास हे हातात हात मिळवूनच जातात. पालकांनी मुलांना स्वातंत्र्य द्यावे, मुलांनीही स्वतंत्रपणे विचार करून आपली करिअर किंवा जीवनसाथी निवडावा. असे करताना थोड्याफार चुका झाल्या, तरी पालकांनी मुलांच्या पाठीशी राहावे. खरे तर या चुकांमधूनच खूप काही शिकायला मिळत असते. मीही कॉलेज संपल्यानंतर एक कोर्स निवडला होता, जो मला जमला नाही. पण माझ्या आई-वडिलांनी आणि भावंडांनी माझ्यावर पूर्णपणे विश्वास दाखवून तो कोर्स निवडण्याचे आणि नंतर तो न जमल्यामुळे सोडून देण्याचे ही पूर्ण स्वातंत्र्य दिले ! त्यावरून मला खूप काही शिकता आले !
 आपल्याला काय जमते हे आपल्याला स्वतःलाच तपासून पाहता येते, आणि तरीही न जमल्यास ते सोडून घेऊन, त्या अनुभवापासून पुढील आयुष्यासाठी खूप काही शिकता येते !
तसेच माझ्या लग्नानंतरही माझ्या पतीने मला हवे तसे जगण्याचे संपूर्ण स्वातंत्र्य दिले ! माझ्या मुलांना वाढवण्यासाठी मी संपूर्ण वेळ "होम मेकर" - गृहिणीची भूमिका निभावली. पण मला पुस्तकांची आणि वाचनाची अतोनात आवड असल्यामुळे, "आपली स्वतःची लायब्ररी असावी" अशी माझी तीव्र इच्छा होती. ते करण्यासाठी सुद्धा माझ्या मिस्टरांनी मला पूर्ण मुभा दिली.बरेचसे आर्थिक नुकसान सोसूनही माझ्या या इच्छेला आणि हौसेला त्यांनी पूर्ण पाठिंबा दिला ! " स्वतःचे वाचनालय चालवणे" हे आर्थिक दृष्ट्या कधीच "नफ्याचे नसते" हे मला सात वर्ष वाचनालय चालवल्यानंतर पूर्णपणे कळून चुकले ! परंतु तरीही त्यांनी मला कायम पाठिंबा दिला !
माझी साहित्याची आणि समाजसेवेची आवड आणि तळमळही मला पूर्ण वेळ घरात स्वस्थ बसू देत नव्हती. मी रोटरी, इनरव्हील, वनिता समाज, सखी मंडळ इत्यादी विविध मंडळांमध्ये काम करू लागले, ते सुद्धा माझ्या घरातल्या सर्व मंडळींच्या पाठिंबामुळे आणि सहकार्यामुळेच !
 माझ्या स्वतःच्याच उदाहरणावरून मला असे सांगायचे आहे, की प्रत्येक व्यक्तीला अत्यंत तळमळीने व आपले इतर कर्तव्य पार पाडून स्वतःसाठी वेगळी ओळख निर्माण करणयाचे स्वातंत्र्य असते ! , स्वतःचे आयुष्य स्वतःच्या आवडीप्रमाणे, इच्छेप्रमाणे जगण्याचे स्वातंत्र्य प्रत्येक व्यक्तीला असतेच, परंतु त्यासाठी प्रत्येक व्यक्तीने आपले इतर माणसांप्रती असलेले कर्तव्य चोखपणे पार पाडावे पाडावे लागते ! 
स्वातंत्र्य म्हणजे मनाला येईल तसे, - स्वैरपणे जगणे नव्हे !
 स्वातंत्र्य म्हणजे मनमानी किंवा स्वैराचार नव्हे ! 
स्वातंत्र्य म्हणजे आपण निवडलेला मार्ग चोखपणे आणि जबाबदारीने निभावणे !!
"पिंक" या सिनेमांमध्ये अमिताभ बच्चन यांनी शेवटी जे भाषण किंवा स्वागत केले आहे, त्याचा स्वैर अनुवाद मी एका कवितेत केला आहे, तोच शेवटी मांडावासा वाटतो -

तू चाल पुढे ,
तुझे स्वातंत्र्य तुझ्या हाती,
मात्र तू जपावीस योग्य नाती‌‌....
तुझ्या नव्या वाटांचा,  
काळ शोध घेईल....
नवी पिढी आता
तुझ्या विचारांचा, बोध घेईल...!
पायीच्या शृंखलांना पैंजण मानू नकोस....
त्या वितळवून त्यांचे 'पंख' कर...
तुला पायी तुड़वणा-यांना, 
तू खुशाल 'ड़ंख' कर !
रूळलेली, काट्याकुट्यांची वाट सोड़, 
अवकाशात भरारी घे...
तुझ्याबरोबर, तुझ्या सारख्या सख्यांना ही ऊभारी दे !
मन तुझं साफ आहे, तर
रावणालाच काय, रामालाही 
तुझी परीक्षा घेण्याचा अधिकार नाही....
तुला त्रासच काय, शिक्षा देण्याचाही अधिकार नाही
तुझ्याच हाती आहे आता अंधारातील मशाल,
तूच आहेस रे मना, ऊद्याचा उषःकाल....
                        ऊद्याचा उषःकाल....!!

✍सुजाता मोघे, 





No comments: